आजही राज्यावर अस्मानी संकट; मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून

आजही राज्यावर अस्मानी संकट; मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. अशात आजही राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह मुसळधार पाऊस होईल. मंगळवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बुधवारीदेखील या भागांत धुवांधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तिथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.