झोपलेल्या कुटुंबासोबत घात,आईनं दोन मुलांची गळा दाबून हत्या,धारदार कोयत्याने पतीवर सपासप वार
झोपलेल्या कुटुंबासोबत घात,आईनं दोन मुलांची गळा दाबून हत्या,धारदार कोयत्याने पतीवर सपासप वार

झोपलेल्या कुटुंबासोबत घात,आईनं दोन मुलांची गळा दाबून हत्या,धारदार कोयत्याने पतीवर सपासप वार
पती-पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात
क्राईम;बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेनं पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी महिलेनं दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर धारदार कोयत्याने आपल्या पतीवर देखील हल्ला केला.
या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी भल्या पहाटे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खूनाच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे.
कोमल मुंढे असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर १ वर्षांचा मुलगा शंभू मिंढे आणि ३ वर्षांची मुलगी पियू मिंढे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. आरोपी महिलेनं पती दुर्योधन मिंढे यांच्यावरही कोयत्याने हल्ल केला आहे. दुर्योधन यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्योधन मिंढे हे आयटी इंजिनिअर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत. ते पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं असून ते घरूनच काम करतात. स्वामी चिंचोली याठिकाणी त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. शनिवारी पहाटे पत्नीने आपल्या दोन्ही मुलांची गळा घोटून हत्या केली.
यानंतर तिने धारदार हत्याराने झोपलेल्या पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले. त्याच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली. पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांना बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोन मुलांची हत्या आणि पतीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र महिलेनं संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनेच हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.