तडजोड नाहीच;माळेगावची निवडणूक पुन्हा राज्यात चर्चेची ठरणार…अजितदादा विरुद्ध तावरे, गुरू-शिष्य लढत होणार
'मागील निवडणूकीत मते मागताना त्यांनी नीरा नदीचा प्रदुषणाचा प्रश्न सोडविणार म्हणून मते घेवून सत्तेत आले.

तडजोड नाहीच;माळेगावची निवडणूक पुन्हा राज्यात चर्चेची ठरणार…अजितदादा विरुद्ध तावरे, गुरू-शिष्य लढत होणार
‘मागील निवडणूकीत मते मागताना त्यांनी नीरा नदीचा प्रदुषणाचा प्रश्न सोडविणार म्हणून मते घेवून सत्तेत आले.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
वरील निवडणूकीत तुल्यबल लढतींसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यासाठी गावोगावी संबंधित पदाधिकाऱ्यांचा गुप्त बैठकांचा धडाका सुरू आहे. त्या प्रक्रियेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी (22 मे) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे पवार आणि तावरे स्थानिक राजकारणातही जुळवून घेतील, अशा चर्चा होत्या. या मेळाव्यात ते चंद्रराव तावरे यांच्यासोबत आघाडी करतील अशी शक्यता होती. पण अजित पवार यांनी आघाडीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
यावेळी अजित पवार यांनी नामोल्लेख टाळत तावरे यांच्यावरही जोरदार टीका केली. “ते हट्टी असतील तर मीही डबल हट्टी आहे. आपल्या वयाचा विचार करून नवीन युवकांना संधी द्यायला हवी. इतकी वर्षे तुम्ही काम केलेलेच आहे, आता नव्या चेहऱ्यांनाही काम करू द्यायला हवे. यांना कारखान्याविषयी खरच आपुलकी असती तर काही जण अडीच वर्षे आणि काही जण 5 वर्षे बोर्ड मिटींगला फिरकलेही नाहीत. असे का घडले? असा सवालही त्यांनी केला.
यानंतर तावरे यांनीही अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे आमचे नेते आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्यावेळी भाजप व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची युती झाली. त्यामुळे फडणविस साहेबांनी आम्हाला सूचना केली आणि आम्ही प्रमाणिकपणे उपमुख्यमंत्र्याना (अजित पवार) मदत केली. असे असताना ते नेते आमच्यावर टिका करतात. त्यामुळे आता माळेगावच्या निवडणूकीत आम्हीसुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा शब्दात चंद्रराव तावरे यांनी नाव न घेता अजित पवार यांना इशारा दिला.
चंद्रराव तावरे स्पष्टच बोलले
उपमुख्यमंत्र्य़ांच्या नेतृत्वाखाली माळेगाव, सोमेश्वर व छत्रपती कारखाना प्रशासनाने मागील ऊस गळीत हंगामात पहिला ॲडव्हान्स २८०० रुपये एकसारखा दिला.
त्या धोरणामुळे विशेषतः माळेगावला सुमारे एक लाख टन गेटकेन ऊस मिळाला नाही. गटकेन ऊस संपल्यावर याच माळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी ३१३२ रुपये प्रतिटन सभासदांना देऊ केले.
या चुकीच्या धोरणामुळे कारखान्याचे पर्यायाने सभासदांचे अर्थिक नुकसान झाले. अशा अनेक गोष्टी आम्ही सडेतोडपणे पुढे मांडणार आहे. त्यामुळे सभासदांना न्याय मिळणार नसले, तर आम्ही समोरच्यांबरोबर (अजित पवार) तोडजोड कशासाठी करायची. चेअरमन होण्यास काय अर्थ आहे, अशा शब्दात विरोधी गटाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी निवडणूकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढण्याचा मनसुबा जाहीर केला. त्यानंतर लागलीच पवारांचे प्रतिस्पर्धी व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी निवडणूकीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
माळेगावच्या कार्य़क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होत असताना नीरी नदीचे प्रदुषित पाण्याचा बंदोबस्त उपमुख्यमंत्री का करू शकले नाहीत, असाही सवाल तावरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ”मागील निवडणूकीत मते मागताना त्यांनी नीरा नदीचा प्रदुषणाचा प्रश्न सोडविणार म्हणून मते घेवून सत्तेत आले. गेली पाच वर्षात अद्याप हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही.”
प्रचार शुभारंभाच्या सभेत चेअरमनेचे नाव जाहीर करणार असे अजित पवार यांनी सांगितले, असे विचारले असता तावरे म्हणाले,“ लोकशाहीमध्ये असे चालते का ? निवडणूकीच्या अगोदर चेअरमनचे नाव जाहीर करणे म्हणजे सुमारे २० हजार सभासदांना किती गृहित धरातात. तालुक्यात विकास केला म्हणता, रस्ते, दिबाबत्ती, पाण्याच्या सुविधा करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे कामच आहेच.
परंतु साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच आवलंबून आहे. येथे राजकारण नको. आपल्या वाडवडीलांनी हा कारखाना उभा करताना मोठे कष्ट घेतले. त्याकाळी पैशाची गुंतवणूक केली आणि तो कारखाना तुमच्या आमच्या हातात दिला. त्यामुळे तो कारखाना सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढाईत उतरलो आहे. त्यामुळे आम्ही अनेक वर्षे चेअरमनपद भूषविल्याने आता त्या पदाची कसलीही अपेक्षा नाही.“ असे तावरे यांनी बोलून दाखविले.