बारामती उपनगराध्यक्ष्यांच्या भागातील नागरीक अंधारात चाचपडतात तेंव्हा !!
या अपूर्ण कामामुळे आत्तापर्यंत किमान छोटे-मोठे वीस-पंचवीस अपघात या ठिकाणी झालेले आहेत

बारामती उपनगराध्यक्ष्यांच्या भागातील नागरीक अंधारात चाचपडतात तेंव्हा !!
या अपूर्ण कामामुळे आत्तापर्यंत किमान छोटे-मोठे वीस-पंचवीस अपघात या ठिकाणी झालेले आहेत
बारामती वार्तापत्र
मागील पाच महिन्यापासून बारामती नगर परिषदेच्या हद्दीत शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौक ते गुणवडी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून अध्याप काम पूर्ण नाही आणि त्या रस्त्यावरील पथदिवे ही बंद आहेत. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावरून जाताना चाचपडत जावे लागत आहे.
राज्यात आणि देशात रोल मॉडेल ठरणाऱ्या बारामतीत रोडची आणि लाईटची ही अवस्था म्हणजे विरोधाभासच आहे.एकीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा कोणतेही विकास कम करायचे असल्यास ते दर्जेदार, टिकाऊ, दूरदृष्टी आणि वेळेत पूर्ण व्हावे असा दंडकच असतो. मात्र बारामतीतील शिवाजी चौक ते गुणवडी या रस्त्याचे काम पाच महिन्यापासून अजून सुरूच आहे या कामामुळे रस्त्यावरील पथदिवे हे बंद असल्यामुळे नागरिकांच्या समस्येत भरच पडत आहे.
छोट्या-मोठ्या अपघाताला निमंत्रण
शहरातील अनेक गजबजलेल्या रस्त्यांप्रमाणेच हा रस्ता देखील सतत रहदारीने गजबजलेला असतो याठिकाणी असणारे दोन पेट्रोल पंप तसेच पुढील बाजूस असणारे मासळी मार्केट तसेच ग्रामीण भागातून शहराला जोडणारा मुख्य रस्ता, एमआयडिसी कंपनीतील कामगारांची ये जा ,भाजी मंडई इत्यादी सर्व कारणांनी या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते त्यातच या अपूर्ण कामामुळे आत्तापर्यंत किमान छोटे-मोठे वीस-पंचवीस अपघात या ठिकाणी झालेले आहेत मात्र दिवाळीपासून हे काम सध्या तरी बंद अवस्थेतच आहे त्यामुळे या कामासाठी अजुन किती दिवस नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे याविषयी प्रश्नचिन्ह आहे
अजितदादांनी उपटले ठेकेदाराचे कान
विकास कामांविषयी अजित दादा हे दूरदृष्टी असणारे नेते समजले जातात या रस्त्याच्या बाबतही अजितदादांनी ठेकेदाराला त्यांच्या शब्दांत समज दिली होती मात्र तरीही ठेकेदार या कामाविषयी दिरंगाई करत असल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे.
‘नगरपरिषद शांतच ‘
नगरपालिका हद्दीत ठेकेदाराला कोणतेही विकासकाम दिले तर ते उच्च दर्जाचे व वेळेत पूर्ण व्हावे याचे नियंत्रण नगरपालिकेकडे असते मात्र या रस्त्याबाबत नगरपालिका कमालीची उदासीन असल्याचे दिसत आहे. हा भाग तीन माजी नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्ष यांचा भाग आहे मात्र तरीही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे याविषयी कोणालाच त्याचे गांभीर्य नाही अशी नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे.