भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं रोखठोक उत्तर
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवार यांनी भारत बायोटेकचा कोरोना लसनिर्मिती प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला होता.

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं रोखठोक उत्तर
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवार यांनी भारत बायोटेकचा कोरोना लसनिर्मिती प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला होता.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
‘भारत बायोटेकचा प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याला पळवला, हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आला आहे. राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे,’ असे रोखठोक उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिले. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवार यांनी भारत बायोटेकचा कोरोना लसनिर्मिती प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांना उत्तर म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरील भाष्य केले.
अजित पवार यांच्यावर कोणता आरोप ?
देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा वापरण्यासाठी मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली घेतली होती, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र, मांजरी येथील ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा देऊन भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला, असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.
अजित पवार यांचे रोखठोक उत्तर
पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे रोखठो उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
प्रकल्प सुरु करण्याचे न्यायालयाचे निर्देश
तसेच पुढे बोलताना “उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली. भारत बायोटेकच्या प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होतं,” असंसुद्धा अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहीन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.