राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली,मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील – संभाजीराजे
महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत.

राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली,मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील – संभाजीराजे
महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत.
कोल्हापूर :प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीतीली सहाव्या जागेवरून लढण्यासाठी इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणं झालं आहे. पुढे काय करायचंय तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत मोजक्या पण सूचक शब्दांत भाष्य केले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार आहे. संजय राऊतांसह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यावर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेत हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे.
6 व्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार ठरला, संभाजीराजेंना शह
दरम्यान, संभाजीराजे याच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. संभाजी राजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती त्यांनीच मीडियाला दिली आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे काही केल्या शिवबंधन बांधणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. हे झालं नाही तर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे हे या निवडणुकीत उडी घेणार आहेत, अशीही माहिती आहे.
तसेच आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट होवू शकते, अशी माहिती हाती आली आहे. आजच्या भेटीनंतर संभाजीराजे याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. संभाजीराजे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करु नये तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी यासाठी घरातूनही आग्रह आहे. अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी, अशी महाराष्ट्रातील संभजीराजे छत्रपती समर्थकाची भूमिका आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.