‘श्री छत्रपती’च्या निवडणुकीत 431 अर्ज पात्र; अजित पवार यांचे निकटवर्तीयाची माघार
संचालकपदाच्या उमेदवारीसाठी 'अजितदादा' घेणार तोंडी परीक्षा

‘श्री छत्रपती’च्या निवडणुकीत 431 अर्ज पात्र; अजित पवार यांचे निकटवर्तीयाची माघार
संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तब्बल 600 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीमध्ये 431 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता निवडणुकीच्या रिंगणात आता 431 उमेदवार राहिले आहेत.
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी 600 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ज्या सभासदांच्या नावावर पाच वर्षांमध्ये किमान तीनवेळा ऊस गाळपासाठी कारखान्यामध्ये आलेला नाही त्यांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले असून, ज्या उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले होते त्यापैकी एक अर्ज वैध ठरवून एक अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे 431 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.
गट क्रमांक एक लासुर्णेमध्ये 28 उमेदवारी अर्ज पात्र ठरलेले आहेत. या गटामध्ये 3 हजार 232 मतदार असून, या गटामध्ये संचालकपदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन जागा आहेत. गट क्रमांक दोन सणसरमधून 55 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या गटामध्ये 4 हजार 621 मतदान आहे.
या गटामध्ये संचालकपदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन जागा आहेत. गट क्रमांक तीन उद्धट येथून 35 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या गटामध्ये 2 हजार 478 मतदार आहेत. या गटामध्ये संचालकपदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन जागा आहेत.
गट क्रमांक चार अंथुर्णे येथून 40 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या गटात 5 हजार 581 मतदान आहे. या गटामध्ये संचालक पदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन जागा आहेत. गट क्रमांक पाच सोनगावमधून 44 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, त्या गटामध्ये 2 हजार 930 मतदान आहे. या गटात संचालकपदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन जागा आहेत.
गट क्रमांक सहा गुणवडी येथून 35 अर्ज पात्र ठरले असून, या गटामध्ये 3 हजार 940 मतदान आहे. या गटात संचालकपदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन जागा आहेत. ब वर्गासाठी 25 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, ब वर्गाचे 324 मतदार आहेत. ब वर्गासाठी संचालकपदाची एक जागा आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून 18 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या प्रवर्गामध्ये संचालकपदासाठी एक जागा आहे.
महिला राखीव प्रतिनिधी प्रवर्गातून 53 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या प्रवर्गामध्ये संचालकपदाच्या दोन जागा आहेत. इतर मागास प्रवर्गांमधून 24 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या प्रवर्गामध्ये संचालकपदासाठी एक जागा आहे. भटक्या/विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून 74 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, या प्रवर्गातून संचालकपदासाठी एक जागा आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत अ वर्गामधून 22 हजार 782 मतदार आहेत. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वात जास्त मतदार अंथुर्णे गटात आहेत. अ वर्गासाठी सणसर गटातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.
सर्वपक्षीय उमेदवारांच्या 24 एप्रिलला मुलाखती
निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार हे 24 एप्रिल रोजी घेणार असल्याची माहिती साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी दिली. या मुलाखतीसाठी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची 2025- 26 ते 2030- 31 या कालावधीसाठी निवडणूक होत आहे. छाननीमध्ये पात्र ठरलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती बारामती येथे दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. वैविध्यरीत्या नामनिर्दिष्ट सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती व चर्चा गटनिहाय आयोजित केलेल्या आहेत. या मुलाखतीसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय पात्र उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किरण गुजर यांची माघार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी माघारी घेतला आहे. त्यांनी अर्ज मागे घेतल्याने विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गुजर यांच्याकडेच येथील निवडणुकीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिली जाणार आहे. शिवाय सर्वपक्षीय पॅनेलच्या समन्वयाची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे असेल.
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी गुजर यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याकडून आयोजित मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावत पुढील पाच वर्षे जाचक यांच्या हाती सूत्रे देत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. पवार यांनीच गुजर यांना अर्ज दाखल करायला लावला असेल, पर्यायी नेतृत्व दिले जात आहे का, अशीही चर्चा सुरू झाली होती, परंतु गुजर यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
यासंबंधी भूमिका स्पष्ट करताना गुजर म्हणाले, श्री छत्रपती हा कारखाना सध्या वाईट अवस्थेतून जातो आहे. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यासाठी या क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेल्या पृथ्वीराज जाचक यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. सुरुवातीच्या काळात जाचक यांना पवार यांनी एकटे पाडल्याच्या चर्चा झाल्या.
त्या थांबविण्यासाठी आणि जाचक यांना आमचा पाठिंबा आहे, हे दर्शविण्यासाठी माझा अर्ज दाखल केला होता. जाचक यांच्याच नेतृत्वात कारखाना पूर्वपदावर येऊ शकतो, त्यामुळे आता मी माझा अर्ज मागे घेतला आहे. कारखान्याला निवडणूक प्रक्रिया परवडणारी नाही. कारखाना वाचविण्यासाठी सभासदांनीच आता विचार करण्याची गरज आहे, जाचक हे सक्षम नेतृत्व आहे, त्यामुळे मी अर्ज मागे घेतला.