हवामान विभागाचा इशारा;”या” जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

हवामान विभागाचा इशारा;“या” जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
बारामती वार्तापत्र
राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. केरळ आणि दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज (३१ मार्च २०२५) आणि पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना धोका?
हवामान खात्याने कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आज, ३१ मार्च रोजी, सिंधुदुर्ग , ठाणे , पालघर , धुळे , नंदुरबार , नाशिक , अहिल्यानगर , सातारा), सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, रायगड , रत्नागिरी , मुंबई , जळगाव , सोलापूर , पुणे , छत्रपती संभाजीनगर , धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पूर्व-मोसमी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर, उद्या (१ एप्रिल २०२५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसाचे कारण, कालावधी आणि शेतीवर परिणाम
केरळ आणि दक्षिणेकडे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हवामानात हा बदल होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवस जाणवेल आणि पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, प्रचंड उकाडाही जाणवत आहे.
या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि फळबागांना या पावसाचा फटका बसू शकतो. त्यामुळे, कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आणि काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही विजांच्या कडकडाटादरम्यान आणि वादळी वाऱ्यावेळी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.