ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार;छत्रपती संभाजीराजेंचं ठरलं!
जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.

ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार; छत्रपती संभाजीराजेंचं ठरलं!
जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.
पुणे:प्रतिनिधी
जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर मी दावा सांगत आहे. या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले.
लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.
पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज (12 मे) जाहीर केली. संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझी संघटना कोणत्याही राजकीय पक्षावर दबावतंत्राचा भाग नाही – संभाजीराजे
माझी संघटना कोणत्याही राजकीय पक्षावर दबावतंत्र नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दौऱ्यावर गेल्यावर केल्यावर त्यांच्या भावना समजून निर्णय घेईन, असे संभाजीराजे यांनी सांगितले. मे महिन्यात मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा असेल. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करण्यासाठी हा दौरा असेल, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.