अजित पवारांची ऑफर नाकारल्याचे कारण सांगत चंद्रराव तावरे म्हणाले, मला पदापेक्षा सभासदांचा प्रपंच महत्वाचा..!
माळेगाव कारखान्याची अवस्था छत्रपती कारखान्यासारखी करण्याचा नेत्यांनी घाट घातल्याचा आरोप

अजित पवारांची ऑफर नाकारल्याचे कारण सांगत चंद्रराव तावरे म्हणाले, मला पदापेक्षा सभासदांचा प्रपंच महत्वाचा..!
माळेगाव कारखान्याची अवस्था छत्रपती कारखान्यासारखी करण्याचा नेत्यांनी घाट घातल्याचा आरोप
सांगवी : प्रतिनिधी
माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी मला चेअरमनपदाची ऑफर दिली होती. मात्र माझ्यासाठी माळेगावच्या सभासदांचा प्रपंच महत्वाचा असल्यामुळे मी ही ऑफर नाकारल्याचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी सांगवी येथे झालेल्या घोंगडी सभेत सांगितले. त्यांचं ध्येयच चुकीचे असल्यामुळे त्यांच्यासोबत जाणे माझ्या मनाला न पटणारी गोष्ट आहे. मला सभासदांचा प्रपंच वाचवायचा आहे, त्यासाठीच ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या प्रचारार्थ सांगवी येथे झालेल्या घोंगडी बैठकीत चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांची ऑफर का नाकारली यावर भाष्य केले.
ते म्हणाले, माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नेत्यांनी माझ्याकडे अनेकांना पाठवले. वेगवेगळ्या ऑफर देत आमच्यासोबत या असा निरोप दिला. परंतु कारखान्याचे आणि सभासदांचे हित लक्षात घेऊन मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला.
वास्तविक माळेगाव कारखान्याबद्दल नेत्यांची भूमिकाच चुकीची आहे. त्यांनी नेहमीच अट्टाहास करत चुकीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत जायचेच नाही. त्यांच्यासोबत जाऊन माळेगाव कारखान्यांवर अवलंबून असलेल्या सभासदांचे वाटोळे करायचे नसल्याचे सांगून चंद्रराव तावरे यांनी त्यांचे आणि आपले जमणारच नसल्यामुळे त्यांच्या ऑफर आपल्यासाठी महत्वाच्या नसल्याचे स्पष्ट केले.
माळेगाव कारखान्याची साखर भिजली असेल तर निवडणुकीतून माघार घेऊ असे नेत्यांनी सांगितले. आम्ही सभासदांच्या साक्षीने कारखान्यावर जाऊन साखर भिजली की नाही हे मिडियालाही दाखवले. आता निवडणुका या व्हायलाच पाहिजेत, प्रचारही झाला पाहिजे म्हणून काहीही बोलणं उचित नसल्याचे ते म्हणाले. माळेगाव कारखान्याची अवस्था छत्रपती कारखान्यासारखी करण्याचा नेत्यांनी घाट घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गेल्या काही वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे जोडून तीन हजार सभासद वाढवण्याचा घाट नेत्यांनी घातला होता. त्याला आम्ही वार्षिक सभेत उघड विरोध केला. मात्र त्यांनी प्रोसेडिंगमध्ये या विषयाला मंजूरी मिळाल्याचे नमूद केले. नंतर आम्ही पाठपुरावा करून हा कट हाणून पाडला. तरीही ते शांत बसले नाहीत. त्यांनी या ११ गावातील काही लोकांना हाताशी धरत न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात आमच्या वकिलाने बाजू मांडल्यानंतर हा विषय कायमचा थांबल्याचं चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
माझ्या जागी कोणीही असते तर नेत्यांची ऑफर स्वीकारली असती. परंतु आपल्याला ऊस धंदा टिकवायचा आहे. कारखानदारी जगली तर आपले शेतकरी जगातील. त्यासाठी योग्य धोरण स्वीकारणाऱ्या संचालक मंडळाची आवश्यकता आहे. त्यामुळेच सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन चंद्रराव तावरे यांनी यावेळी केले.