आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली : डिजीएम रणजीतकुमार मोदी
१५० हून जास्त स्वयंसेवकांनी भाग घेतला

आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली : डिजीएम रणजीतकुमार मोदी
१५० हून जास्त स्वयंसेवकांनी भाग घेतला
इंदापूर; प्रतिनिधी
जगात एकीकडे भौतिक सुविधा वाढत असल्या तरी दुसरीकडे मानवी आयुर्मान घटत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन एस्टोनिया वन कंपनीचे डीजीएम रणजितकुमार मोदी यांनी केले.
इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य संदेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्ट सभागृहात आरोग्य जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर होते. या कार्यशाळेत शहर किंवा गाव तिथे आरोग्यदूत किंवा आरोग्यताई या उपक्रमात १५० हून जास्त स्वयंसेवकांनी भाग घेतला. ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त अरविंद गारटकर, खजिनदार तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
श्री. मोदी पुढे म्हणाले, आरोग्य हे बाजारात विकत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी शिल्पकार होणे गरजेचे आहे. अमेरिका, जपान, सौदी अरेबिया सह तीस देशात भारतीय आयुर्वेद औषधांनी बाजारपेठ मिळवली आहे. कॅन्सर, दमा, संधिवात, मधुमेह, थायरॉईड, स्त्री व पुरुष वंध्यत्व, मणक्याचे विकार, सोरायसिस मूतखडे, पित्ताशयाचे खडे आदी २०० हून जास्त आजारावर ही औषधे प्रभावी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य साक्षर होऊन आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे शिल्पकार होणे ही काळाची गरज आहे.
यावेळी विश्वस्त अरविंद गारटकर म्हणाले, आरोग्य संदेश प्रतिष्ठान ने आरोग्य सर्वांसाठी या उपक्रमात आयुर्वेद घरोघरी, गावोगावी पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रतिष्ठानला संपूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सौ. पूनम मोदी, अकलूज येथील डॉ. संतोष काटकर, डॉ. पल्लवी काटकर, बावडा येथील डॉ. जयशंकर विभुते यांनी आयुर्वेदाचे महत्व सोदाहरण स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी तर आभार प्रदर्शन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी केले. यावेळी पतंजली योग समितीचे मल्हारी घाडगे, देवराम मते, जनार्दन क्षीरसागर, विलास बोराटे, मुन्ना बागवान, कोपी वरची शाळा प्रमुख भारत बोराटे, वृक्ष संजीवनी परिवाराचे संस्थापक हमीद अत्तार, सुधीर करगळ, रामवर्मा आसबे, समाधान पानसरे, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, अमोल राऊत, रोहिणी जाधव, केदार गोसावी, भारत माने उपस्थित होते.