एकच कुटुंब उद्ध्वस्त!;माझ्या मुलींना वाचवा…मृत्यूच्या दारात असतानाही पित्याची आर्त हाक!
जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एकच कुटुंब उद्ध्वस्त!;माझ्या मुलींना वाचवा…मृत्यूच्या दारात असतानाही पित्याची आर्त हाक!
जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील महात्मा फुले चौकात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हायवा डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पिता आणि दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाले.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले ओंकार राजेंद्र आचार्य (वय 36) हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सोबत मुलगी सई (वय 10) आणि अवघी चार वर्षांची मधुरा यांचा दुर्दैवी अंत झाला.
अपघाताच्या क्षणी हायवाच्या चाकाखाली चिरडले गेलेले ओंकार आचार्य पोटापासून खालचा भाग पूर्णतः धडावेगळा झालेल्या अवस्थेत होते. तरीही त्यांनी दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न केला आणि आजूबाजूच्यांना “माझ्या मुलींना तरी वाचवा” अशी करुण हाक दिली. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पित्याचे हे शब्द ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. मात्र दुर्दैव असे की, मुलींसह तिघेही जागीच मृत्यूमुखी पडले.
या घटनेने आचार्य कुटुंबावर दुहेरी आघात झाला. मुलगा आणि नातवंडांच्या अकाली मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय 70) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक असून परिसरात लोकप्रिय म्हणून ओळखले जात.
महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते नुकतेच घरी परतले होते. परंतु मुलगा व नातवंडांचा मृत्यू त्यांना सहन झाला नाही आणि दुःखाच्या छातीत त्यांनी प्राण सोडले. ओंकार आचार्य हे आपल्या वडिलांसाठी फळे घेण्यासाठी रविवारी सकाळी खंडोबानगर येथे गेले होते. त्याचवेळी शाळेतून मुलगी सईला घेऊन परत येत असताना, महात्मा फुले चौकात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
दुचाकीखाली अडकून त्यांचा आणि मुलींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातानंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओंकार यांच्या पश्चात पत्नी अरुणा, आई शैलजा आणि भाऊ अमोल असा परिवार शिल्लक आहे. संपूर्ण बारामती शहरातून या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त होत आहे. या भीषण अपघातामुळे केवळ एकच कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर बारामतीच्या सामाजिक जीवनातही शोककळा पसरली आहे. वडिलांचे आपल्या मुलींवरील अमर्याद प्रेम, मृत्यूच्या उंबरठ्यावर दिलेली आर्त हाक आणि त्यानंतर कुटुंबावर कोसळलेले दुहेरी संकट, यामुळे या घटनेने सर्वांच्या हृदयाला खोलवर जखम केली आहे.