जरंडेश्वर प्रकरणानंतर भाजपा आक्रमक; कारखान्यांत गैरव्यवहार कारवाईसाठी अमित शहांना पत्र, ‘ते’ 30 कारखाने कोणाचे?
पत्रासोबतच राज्यातील 30 साखर कारखान्यांची यादी

जरंडेश्वर प्रकरणानंतर भाजपा आक्रमक; कारखान्यांत गैरव्यवहार कारवाईसाठी अमित शहांना पत्र, ‘ते’ 30 कारखाने कोणाचे?
पत्रासोबतच राज्यातील 30 साखर कारखान्यांची यादी
पुणे, बारामती वार्तापत्र
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक लेटरबॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करणारं पत्र चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांना लिहिले आहे.
ते 30 कारखाने कोणाच्या मालकीचे?
जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रासोबतच राज्यातील 30 साखर कारखान्यांची यादी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली आहे. आता हे 30 कारखाने नेमके कोणते आणि त्याचे संचालक कोण? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अन्यथा पुरावे नष्ट करू शकतात
चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रात म्हटले, ईडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केली. या कारवाई प्रमाणेच राज्यातील इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा संबंधित व्यक्ती पुरावे नष्ट करू शकतात किंवा त्यामध्ये त्रयस्थ हितसंबंध निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेस विलंब लाऊ शकतात.
राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने संचालकांच्या नातेवाईकांना कवडीमोल किंमतीला विकले गेले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना 22 ऑगस्ट 2019 रोजी आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अजित पवार आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता.
आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय दबावामुळे अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाबाबत 72,000 पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यापूर्वीच ईडीने दक्षतेने कारवाई केल्यामुळे दखल घेतली गेली आणि जरंडेश्वरच्या जप्तीसारखी कारवाई केली गेली असंही पत्रात म्हटलं आहे.