स्थानिक

पालकांनी मुलांवर मते लादू नयेत- डॉ. नंदू मुलमुले

मुलांना आवड व पॅशन यांचा समन्वय साधता आला पाहिजे.

पालकांनी मुलांवर मते लादू नयेत- डॉ. नंदू मुलमुले

मुलांना आवड व पॅशन यांचा समन्वय साधता आला पाहिजे.

बारामती वार्तापत्र 

ज्या क्षणी मुलांच्या यशाची सांगड पालकांकडून सुखाशी घातली जाते, त्या क्षणी त्या मुलांची यशाकडे जाणारी वाटचाल खडतर होऊन जाते, त्या मुळे मुलांवर पालकांनी त्यांची मते न लादता त्यांना ज्यात आनंद मिळणार आहे, ती वाट निवडू द्यावी, असा कानमंत्र ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांनी बारामतीकरांना दिला.

येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित प्रतिबिंब व्याख्यानमालेअंतर्गत यशाकडून आनंदाकडे या विषयावर शनिवारी (ता. 31) डॉ. मुलमुले यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.

ते म्हणाले, पालकांनी मुलांवर अपेक्षांच ओझ लादू नका. ज्यातून त्याला शिक्षणासोबतच आनंदही मिळेल, असेच शिक्षण त्याला घेऊन द्यावे. मुलांना फक्त मार्क्सवादी करु नका, त्यांच ध्येय आणि उद्दीष्ट त्यांनाच निवडू द्या. मुलांना आवड व पॅशन यांचा समन्वय साधता आला पाहिजे. मुलांवर लादलेले उद्दीष्ट साध्य होत नाही, त्यांची वाटचाल आनंददायी असली पाहिजे व त्यांच्यातील कुतूहल जागे असणे गरजेचे आहे. आनंदी आणि सुखी होण्याचा एकच मार्ग म्हणजे यशस्वी व्हायला पाहिजे, हे खरे असले तरी मुलांना त्यांचा मार्ग निवडू द्यावा. मुलांची परस्परांशी कधीच तुलना करु नका, न्यूनगंडाची निर्मिती यातून व्हायला सुरवात होते. मुलांवर मतेही लादू नका.
पालकत्वाचा अतिरेक होऊ देऊ नये.

आनंद आणि सुख या बाबत बोलताना ते म्हणाले, सुखाला अप्रुप ओसरण्याचा शाप असतो. सुखाची प्रत्येकाची संकल्पना भिन्न असते. अपेक्षा हेच दुःखाचे खरे मूळ असते, या भगवान गौतम बुध्दाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी नमूद केले, निरपेक्ष भावनेने एखाद्यासाठी काहीतरी करण्यातच खरा आनंद असतो. देऊन जे मिळते तो आनंद आणि घेऊन मिळते ते सुख, अशी व्याख्या त्यांनी सांगितली.

किमान साठीच्या वयोगटात माणसाला समाधान मिळायला हवा. समाधान नसेल तर यश आणि सुखाला अर्थ उरत नाही. आयुष्य जगल्यानंतर समाधान मिळणे गरजेचे आहे. सर्वांनाच जे हवे ते मिळत नाही, पण तरीही समाधान मिळणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!