पालखी महामार्गाच्या भूसंपादनातून कै. शेरकरबाबा समाधीस्थळ वाचवण्यासाठी ग्रामस्थांसह सामाजिक संस्था एकवटल्या
स्वातंत्र्यदिनी करणार लाक्षणिक उपोषण

पालखी महामार्गाच्या भूसंपादनातून कै. शेरकरबाबा समाधीस्थळ वाचवण्यासाठी ग्रामस्थांसह सामाजिक संस्था एकवटल्या
स्वातंत्र्यदिनी करणार लाक्षणिक उपोषण
इंदापूर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील मौजे सुरवड/ वकील वस्ती ( ता.इंदापूर ) येथील वै.शेरकरबाबा समाधीस्थळ महामार्गावरील भूसंपादनातून वाचवण्याबाबत वै. शेरकरबाबा मंदिर सेवा भावी ट्रस्ट व वै. शेरकरबाबा समाधी मंदिर बचाव समितीने सोमवारी ( दि.९ ) इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्ग ९६५-जी मध्ये गट नं.१० भूसंपादन यामध्ये बाधित होणार आहे. परंतु कै.शेरकरबाबा महाराज समाधी मंदिर मौजे वकिलवस्ती-सुरवड येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजमितीला संपूर्ण वारकरी संप्रदायाचे दैवत, आशास्थान, प्रेरणास्थान,श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आहे. ही समाधी हलवण्याचा प्रयत्न झाला तर समस्त वारकरी संप्रदायाच्या भावनेशी खेळल्या प्रमाणे होईल.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा येथून जाताना या मंदिरामध्ये आरतीसाठी पालखी थांबून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो.वै.शेरकरबाबा महाराज हे आमचे दैवत असून या ठिकाणाहून जाणारा पालखी महामार्ग हा मंदिराला बाधा न होता इतर मार्गाने नियोजन करून मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करावा.मंदिर वाचवण्यासाठी पूर्व बाजूस असलेले शेतकरी पालखी महामार्गासाठी स्वतःची जमीन देण्यास तयार आहेत.ती जमीन वापरात आली तर पालखी महामार्गास जे वळण बसणार आहे ते सरळ होण्यास मदत होईल अशा आशयाचे निवेदन सोमवारी ( दि.९ ) तहसीलदारांना देण्यात आले असून सदरील मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी वै.शेरकरबाबा महाराज समाधी मंदिरासमोर टाळमृदुंगाच्या गजरामध्ये करत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ज्ञानदेव महाराज शेरकर, नागनाथ तोरसकर, गुरुदेव घोगरे, आप्पा पारेकर, अंकुश होनमाने, पांडुरंग शेरकर व अन्य उपस्थित होते.