राजकीय

भावकीने लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांच्या टोमण्याला आता राजेंद्र पवार उत्तर, म्हणाले..”पवार कुटुंबात प्रत्येक काकाने आपल्या पुतण्याला पाठबळ दिले आहे, हीच आमची रीत”

मला कारखान्याला संधी दिली नाही.

भावकीने लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांच्या टोमण्याला आता राजेंद्र पवार उत्तर, म्हणाले..”पवार कुटुंबात प्रत्येक काकाने आपल्या पुतण्याला पाठबळ दिले आहे, हीच आमची रीत”

मला कारखान्याला संधी दिली नाही.

बारामती वार्तापत्र

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेती, राजकारण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या भविष्यावर सडेतोड मते मांडली.

काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार  यांनी रोहित पवार यांना शा‍ब्दिक चिमटा काढला होता. आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय, हे लक्षात ठेवावं. भावकीने लक्ष घातलं नसतं तर तू निवडून आला नसता, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांना मदत केली होती. नवख्या माणसाला किती मतदान पडतं आपल्याला माहिती आहे. परंतु, त्यानंतर अजित पवार यांनी 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्त्व केले. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं, मग मी शांत बसलो.

त्यावेळेस मला माहित नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते. मला कारखान्याला संधी दिली नाही. त्यानंतर वाटलं असेल की हा कारखाने काढेल. जळगावला काढेल, नगरला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला संधी दिली नाही आणि मी आता इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञान काय आहे सांगायला उभा राहिलो आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाही.

गायीच्या व्यवसायाचा रंजक किस्सा

राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या व्यवसाय कौशल्याचा दाखला देताना रंजक किस्सा सांगितला. “गायी आणायला गेलो तेव्हा अजित दादा केबिनमध्ये बसले, मी गायीच्या शेपटाजवळ. दादा पुढच्या केबिनमध्ये गेले, पण मी मागेच राहिलो. माझी गाय तीन हजाराला गेली, तर दादांची नऊ हजाराला,” असे सांगत त्यांनी अजितदादांचे कौतुक केले.

एआय साखर उद्योगाचं भविष्य बदलेल, शेतकऱ्यांनी सबसिडीवर अवलंबून राहू नये: राजेंद्र पवार

संघटनावाल्यांना मला काय म्हणायचं नाही. त्यांचे ते काम करतात. पण मला तरी वाटत नाही की, शेतमालाचा भाव वाढेल. स्वस्तवाल्यांना जास्त लोक मतदान करतात, सरकार आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पाणी जर जास्त दिलं तर पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाहीत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव एवढा असेल की, पुढच्या आठ दहा वर्षात शाळेत शिकवायला शिक्षक नसतील, गाडी चालवायला ड्रायव्हर नसतील. 2040 मध्ये मेंदूदेखील बदलला जाणार आहे. त्यामुळे राजकारण देखील तसेच असणार आहे. भरणे मामा त्या काळात आम्ही नसतो, तुम्हाला संधी आहे, अशी टिप्पणी राजेंद्र पवार यांनी केली.

इथे राज्यकर्ते स्टेजवर आहेत मला कोणाला नावे ठेवायची नाहीत. माळेगाव मध्यवर्ती संशोधन केंद्राने 265 सारखी उसाची जात काढून टनाटनाने महाराष्ट्राचे साखर वाढवली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे बघायला कोण तयार नाही. विद्यापीठाला नावे ठेवू नका. त्यांना आपल्याला मदत करणे गरजेचे आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते का नाही, हा तुमचा विषय आहे. कृषीमंत्र्यांना मला सांगायचं आहे महाराष्ट्रात एका एका स्क्वेअर फुटाचे देखील मापन झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी, नागपूर भागात त्याला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. सबसिडीसाठी जो थांबतो कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सबसिडीसाठी थांबू नका, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले

Related Articles

Back to top button