महाविकास आघाडी सरकार फसवे – हर्षवर्धन पाटील
महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली त्वरित थांबवावी

महाविकास आघाडी सरकार फसवे – हर्षवर्धन पाटील
महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली त्वरित थांबवावी
इंदापूर: प्रतिनिधी
महावितरणने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून गेली काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली सुरु केली आहे. वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळून चालली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत चालु करावा,अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी केली.
ते पुढे म्हणाले,शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असावयास हवी, मात्र महाविकास आघाडी सरकार हे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज खंडित करीत आहे. या सरकार मधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्वासन दिले होते. परंतु या शब्दाला जागणे दूरच उलट वीज रोहित्रे बंद करून शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार हे फसवे सरकार आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.
कोरोना,अतिवृष्टी यामुळे शेती नुकसानीत जाऊन शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा अडचणीतही या मोहिमेत आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी त्रास न देता महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात अनेक दिवसांपासून वीज तोडणी मोहीम चालू असूनही तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री वीज तोडणी मोहिमेबाबत मूग गिळून गप्प आहेत. सध्या उन्हाळा वाढत चालला असून वीज तोडणी मोहिमेमुळे महाविकास आघाडी सरकार याबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या असंतोषाची दखल शासनाला घ्यावीच लागेल, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला. तसेच गावोगावच्या नळ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने वीज बिलाअभावी खंडित करू नये, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.