राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची, मागणी बाळासाहेब थोरातांचं मुख्यमंत्र्यांकडे पत्र
पश्चिम बंगालमधील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घोषणा

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची, मागणी बाळासाहेब थोरातांचं मुख्यमंत्र्यांकडे पत्र
पश्चिम बंगालमधील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घोषणा
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणावरही केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहेत. अशावेळी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यासाठी एक पत्रच थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनेही त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारं पत्र थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकाराचे लसीकरण करण्याबाबत आता राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.
या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. तरी आपण या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी थोरात यांनी पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा पत्रकारांना लाभ घेता येणार आहे. त्या कोलकातामध्ये बोलत होत्या.