राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा ?; अजित पवारांनी दिली माहिती
या सर्व खोट्या बातम्या आहेत.

राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा ?; अजित पवारांनी दिली माहिती
या सर्व खोट्या बातम्या आहेत.
पुणे:प्रतिनिधी
राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क बाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 86 टक्के लसीकरण झालं आहे. त्या तुलनते पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झालं आहे. 90 हजार सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत, तरी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. 87 हजार रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. 1 कोटी 61 लाख 16 हजार लोकांचे लसीकरण जिल्ह्यात झालं आहे, अशी माहिती देतानाच दोन दिवसापासून पुण्यात रुग्ण कमी होत आहेत, ती अजून कमी व्हावी ही अपेक्षा आहे, असं अजित पवार म्हणाले.