इंदापूर

वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा रासप कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन – किरण गोफणे

इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन

वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा रासप कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन – किरण गोफणे

इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन

इंदापूर : प्रतिनिधी

सरकारकडून सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली थांबवून तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडावे या मागणीसाठी इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला असून सदरील प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांचे निवेदन आज (दि.१९) रोजी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.

सदरील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेत मालाला कमी असलेले बाजार भाव, कोरोनामुळे संकटात असलेले शेतीचे अर्थकारण, शेतकरी, शेतमजूर,कामगार, बारा बलुतेदार, कारागीर, छोटे व्यवसाय अत्यंत आर्थिक अडचणी आहेत. अशातच महावितरण कंपनीने अंदाजे आकारले भरमसाठ वीज बिल यामुळे ग्राहकांची थकबाकी वाढलेली आहे.विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात सरकारने वीज थकबाकीदार ग्राहकांची खास करून शेतकरी वर्गाची वीज तोडणार नसल्याचे आश्वासन दिले होते. यास कलाटणी देऊन शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी सुरू केली आहे. सध्या शेतात पाणी असूनही वीज पुरवठा बंद केल्याने पिके वाळून जात आहेत.अनेक व्यावसायिकांना बारा बलुतेदार कारागिरांना वीज तोडली जात असल्याने रोजगाराला मुकावे लागत आहे. अनेक ठिकाणी महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने वसुली करून शिवराळ भाषा वापरत आहेत. या सर्व प्रकाराचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत असून छोटे व्यवसायिक व इतर घटकांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाऊ नये, अन्यथा वीज मंडळांच्या कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी फिरकू दिले जाणार नाही. अशा आशयाचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे म्हणाले की,गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास व शेतातील उभी पिके करपून चाललेली आहेत. त्यामुळे त्या शेतकर्‍यांची वीज जोडणी तात्काळ केली पाहिजे.गेल्या अनेक वर्षांपासून वीजबिले आली नव्हती ती थकलेली वीज बिले आत्ता आली असून प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम जवळपास एक लाखांच्या पुढे असल्याने शेतकऱ्यांनी ती बिले भरायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचबरोबर या वर्षी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट अशी अस्मानी सुलतानी संकटे शेतकऱ्यांवरती आहेत. अशा काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार भाव नाही. लॉकडाउन च्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांना लुटत असताना अशा परिस्थितीत वीज कनेक्शन खंडित होत असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष गप्प राहणार नाही वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोफणे यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे,तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, तालुका कार्याध्यक्ष अजित भाळे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते,नानासो खरात,आप्पासाहेब माने,तानाजी नरुटे,सतीश नरुटे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button