शिवभोजन थाळी….एक वर्ष!

गेल्या वर्षी नववर्षाच्या प्रारंभी या योजनेचा शासन निर्णय आला आणि 26 जानेवारी 2020 रोजी राज्यात या योजनेचा शुभारंभ झाला

शिवभोजन थाळी….एक वर्ष!

गेल्या वर्षी नववर्षाच्या प्रारंभी या योजनेचा शासन निर्णय आला आणि 26 जानेवारी 2020 रोजी राज्यात या योजनेचा शुभारंभ झाला

बारामती वार्तापत्र

नुकताच सर्वांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. बरोबर एक वर्षापूर्वी सामान्य माणसाची भूक भागविण्यासाठी शिवभोजन थाळीचा शुभारंभ पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात या योजनेमुळे अनेक गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरात पोटभर अन्न मिळाले आहे.

गेल्या वर्षी नववर्षाच्या प्रारंभी या योजनेचा शासन निर्णय आला आणि 26 जानेवारी 2020 रोजी राज्यात या योजनेचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर किमान एक भोजनालय सुरू करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असे भोजनालय सुरू करण्यात आले.

शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक मूद भात, एक वाटी भाजी आणि एक वाटी वरणाचा समावेश करण्यात आला. भोजनालय सुरू करण्यासाठी सुरू असलेली खानावळ, बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यातून सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय अशा ठिकाणी भोजनालय सुरू करण्यात आले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत नंदुरबार शहरात 3, शहादा 2, तळोदा 2, अक्कलकुवा 2, नवापूर 2 आणि धडगाव  येथे 2 अशी एकूण 13 भोजनालये सुरू आहेत.  11 भोजनालयातून प्रतिदिन 100 थाळ्याचे वितरण करता येते, तर नंदुरबार येथील दोन भोजनालयात 200 थाळ्यांचे वितरण करण्यात येते.

आतापर्यंत नंदुरबार शहरात 1 लाख 36 हजार 682, शहादा 63 हजार 385, तळोदा 63 हजार 831, अक्कलकुवा 46 हजार 281, नवापूर 53 हजार 834 आणि धडगाव  येथे 51 हजार 771 अशा एकूण 4 लाख 15 हजार 784 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. विशेषत: ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी या योजनेचा चांगला लाभ झाला आहे.

शहरी भागात थाळीची किंमत 50 रुपये आणि ग्रामीण भागत 35 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सुरूवातीला ग्राहकांकडून 10 रुपये घेऊन इतर रक्कम अनुदानाच्या स्वरुपात भेाजनालय चालकाला देण्यात येत असे. कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले, अनेक मजूरांचे स्थलांतर झाल. अशा परिस्थितीत दिलासा देण्यासाठी ग्राहकांसाठी थाळीची किंमत केवळ 5 रुपये करण्यात आली.

 

नंदुरबार जिल्ह्यात शासनातर्फे आतापर्यंत शिवभोजन थाळीसाठी 1 कोटी 20 लक्ष 27 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातदेखील एकूण 905 केंद्रातून 3 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

 

दुर्गम आदिवासी भाग असणाऱ्या नंदुरबारसारख्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे. विशेषत: धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना ही योजना दिलासादायक ठरली आहे.  येत्या काळातही ही ‘अन्नपुर्णेची थाळी’ गरीब आणि गरजूंची  क्षुधा शांत करून  आणि त्यांना तृप्ततेचा अनुभव देईल हे निश्चित.

Related Articles

Back to top button