शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोठी बातमी, पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!
भारतात कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोठी बातमी, पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!
भारतात कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अवकाळी पावसाचं संकट जाण्याचं काही नाव घेत नाही. एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे.
काल नाशिक, धुळे आणि नंदुरबार परिसरात अनेक ठिकाणी हलक्या पावसासह गारपीट झाली आहे. धुळ्यात गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बर्फाच्छादित झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण ऐन रब्बी हंगामात गारपीट झाल्यानं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आता हवामान विभागानं पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत केरळ,माहेमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कोकण गोवा,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होणार आहे. पण पुण्यासह घाट परिसर, लगतचा मराठवाडा आणि कोकणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस कोसळू शकतो.
दुसरीकडे, येत्या दोन दिवसात वायव्य भारतासह मध्य भारतात कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर गुजरात परिसरात येत्या तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होणार आहेत. त्यानंतर देशातील हवामान काही दिवस स्थिर राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय देशात चालू महिन्यात कमाल तापमान 38 अंशाच्या आसपास राहणार आहे. पण महिन्याच्या शेवटी त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.