शेतकऱ्याची दोन एकर केळी बाग वादळी पावसाने जमीनदोस्त शेतकरी हवालदिल
सात लाख रुपयांचे झाले नुकसान.

शेतकऱ्याची दोन एकर केळी बाग वादळी पावसाने जमीनदोस्त शेतकरी हवालदिल
सात लाख रुपयांचे झाले नुकसान.
बारामती वार्तापत्र
मागील दोन वर्षांपासून अवकाळी, गारपिट व कोरोना संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे.आसमानी सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सावरत असतानाच मागील दोन दिवसात इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांना कालच्या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. येथील सुजित मासाळ या युवा शेतकऱ्याची दोन एकर केळी बाग या वादळी पावसाने जमीनदोस्त होऊन सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.केळी विक्रीला आली होती. व्यापाऱ्याने आठ रुपये किलोच्या दराने घेऊन जाण्याचा व्यवहारही केला होता. मात्र वादळी पावसाने बाग जमीनदोस्त झाल्याने माझे प्रचंड नुकसान झाल्याची कैफियत युवा शेतकरी सुजित मासाळ याने व्यक्त केली आहे.
दोन एकर केळी बागेसाठी मासाळ यांनी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च केला. या नैसर्गिक संकटामुळे त्यांची विक्रीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत करावी, अशी मागणी युवा शेतकरी मासाळ यांनी केली आहे.