हे मंदिर आहे सहकाराचं, पवित्रता राखा : चंद्रराव तावरे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ढीगानं मतं दिली, तुम्हाला मोठं केलं, आता तुम्ही कसं वागता : तावरेंचा अजित पवारांना सवाल
कारखान्याकडे आलो नाही म्हणून काय मी तुमच्या पॅनलचा झालो का?

हे मंदिर आहे सहकाराचं, पवित्रता राखा : चंद्रराव तावरे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ढीगानं मतं दिली, तुम्हाला मोठं केलं, आता तुम्ही कसं वागता : तावरेंचा अजित पवारांना सवाल
कारखान्याकडे आलो नाही म्हणून काय मी तुमच्या पॅनलचा झालो का?
बारामती वार्तापत्र
“माळेगाव साखर कारखाना म्हणजे केवळ एक उद्योग नाही, तो आपल्या गावांच्या प्रपंचाचा आधार आहे. आपल्या पूर्वजांनी उभं केलेल्या या सहकाराच्या मंदिराची पवित्रता राखणं हीच खरी जबाबदारी आहे असं सांगतानाच १९६७ पासून आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना काहीही न मागता ढीगाने मतं दिली. तुम्हाला मोठं केलं, मुंबईला पाठवलं आणि आज तुम्ही कसं वागता ? असा सवाल करत माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर परखड शब्दांत निशाणा साधला.
सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या शिरवली येथील घोंगडी बैठकीवेळी चंद्रराव तावरे यांनी सभासदांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.
कारखान्याकडे आलो नाही म्हणून काय मी तुमच्या पॅनलचा झालो का?अजित पवार म्हणतात मी पाच वर्षे कारखान्यात आलो नाही. मग मी काय तुमचं काम बघायला बांधील आहे का? तुमचे संचालक होते, त्यांना काम करू द्या ना. आम्ही सत्तेत असताना तुम्ही आणि तुमच्या संचालकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केलात, गोंधळ घातला. पण मी तुम्हाला विरोध केला नाही, मोकळीक दिली, तरी तेही चालेनासं झालं,असा टोला तावरे यांनी लगावला.
साखर भिजली नाही म्हणणं म्हणजे सभासदांच्या डोळ्यात धूळ
काल नेते म्हणाले, साखर भिजलीच नाही. आतापर्यंत ६० हजार पोती साखर भिजली आहे. १८ कोटी ४० लाखांचं नुकसान झालंय. नवीन गोडावून बांधताना त्याच्या खर्चापेक्षा अधिकच्या ६५ लाखांनी जास्त खर्च केले. प्लॅस्टिकचे पत्रे लावले. हे पत्रे गोडावूनवर लावणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा. काही दिवसांनी वादळात ते पत्रे उडून गेले आणि गोडावूनमधली साखर भिजली. तरीही हे म्हणतात साखर भिजलीच नाही. आम्ही आजही साखर भिजल्याचे पुरावे द्यायला तयार आहोत, तुम्ही फक्त बघायची तयारी ठेवा असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
स्वत:च निवडणूक पुढे ढकलली, आणि आरोप मात्र आमच्यावर
ते म्हणतात आम्ही निवडणूक पुढे ढकलली. वास्तविक त्यांनी दोन वेळा सर्व्हे केला आणि दोन्ही वेळा जनतेनं नकार दिला म्हणून स्वतःच निवडणूक लांबवली. आता आरोप आमच्यावर करतात. आता छत्रपतीची निवडणूक १० वर्षे लांबणीवर पडली. १० वर्षांनी निवडणूक झाली. तेव्हा कायदेही यांच्याच मनाचे असतात.
मी चेअरमन झालो असतो, तर तुमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला असता
निवडणूक बिनविरोध करा, चेअरमन तुम्हीच व्हा असा नेत्यांचा निरोप आला. पण मी ठाम नकार दिला. माझ्या जागी कोणी दुसरा असता, तर तो खुर्चीवर बसला असता. पण मी माझ्या लोकांमध्ये राहणं पसंत केलं. मी जर चेअरमन झालो असतो तर अक्षरश: तुमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला असता असं सांगत मी ४० वर्षांत कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. संस्थेचं नुकसान होत असेल तर मी विरोध करणारच अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
छत्रपती कारखान्याचं वाटोळं; ऊस नसलेले सभासद?
छत्रपती कारखान्यात ३३ हजार सभासद करून टाकलेत. ऊस नसलेली लोकं सभासद झालीत. मतदान करायला येतात, साखर घेऊन जातात. हेच का नियोजन? यामुळंच छत्रपती कारखान्याचं वाटोळं झालं असल्याचे नमूद करून चंद्रराव तावरे यांनी सभासदही आता कारखान्याशी हितसंबंधाच्या आधारावर निवडले पाहिजेत अशी भूमिका मांडली.
नदीचं प्रदूषण थांबवणार म्हणाले आणि आज गावागावात मतं मागत फिरतायत
मागच्या वेळेस म्हणाले, नदीचं प्रदूषण थांबवतो. नाही झालं तर मत मागायला येणार नाही. पाच वर्षात प्रदूषण बंद झालं का असा सवाल करत चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. प्रदूषण बंद नाही केलं तरी आता तुम्ही गावोगावी मतं मागत फिरत आहात असा टोला त्यांनी लगावला.
आपण एकत्र आलो, तर कारखाना वाचेल
भाषणाच्या शेवटी तावरे यांनी तुम्ही माझं चाळीस वर्षांचं काम पाहिलं आहे. आता या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपला कारखाना वाचवा असे आवाहन शेतकऱ्यांना केले.