प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या बालकांच्या कामगिरीने महाराष्ट्र शूरांची, गुणवंतांची भूमी असल्याचे पुन्हा सिद्ध -अजित पवार यांचे गौरवोद्गार

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या बालकांच्या कामगिरीने महाराष्ट्र शूरांची, गुणवंतांची भूमी असल्याचे पुन्हा सिद्ध
-अजित पवार यांचे गौरवोद्गार
मुंबई :- बारामती वार्तापत्र रिपोर्ट
महाराष्ट्रातील कामेश्वर जनन्नाथ वाघमारे, श्रीनभ अग्रवाल, अर्चित राहूल पाटील, सोनित सिसोलेकर, काम्या कार्तिकेयन यांच्यासह ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या देशातील ३२ बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, गुणवंतांची, नवनिर्माणाची ध्यास असलेल्या प्रज्ञावंतांची भूमी असून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या बालकांनी ते पुन्हा सिद्ध केलं आहे. या पुरस्कारविजेत्या बालकांची कामगिरी महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला राष्ट्रनिर्माणासाठी वाहून घेण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्या बालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या बालकांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार – कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि. नांदेड) याला, नवनिर्माणासाठी – श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित राहूल पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी- सोनित सिसोलेकर (पुणे), आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी – काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांचा झालेला गौरव हा महाराष्ट्रातील समस्त बालकांचा, देशाच्या भावी पिढीचा गौरव आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, मित्रांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.