लोकसभा-विधानसभेला गोड बोलणाऱ्या अजित पवारांना अण्णांच्या वयाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही: रंजनकुमार तावरे
वेळ नाही म्हणून जिल्हा बँकेचा राजीनामा दिला आणि आता माळेगावमध्ये लक्ष घालतायत : रंजनकुमार तावरे यांची अजित पवारांवर टीका

लोकसभा-विधानसभेला गोड बोलणाऱ्या अजित पवारांना अण्णांच्या वयाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही: रंजनकुमार तावरे
वेळ नाही म्हणून जिल्हा बँकेचा राजीनामा दिला आणि आता माळेगावमध्ये लक्ष घालतायत तावरे यांची अजित पवारांवर टीका
शिरवली : प्रतिनिधी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने अण्णांशी मिटवतं घेणारे अजित पवार आता अण्णांच्या वयावर बोलत आहेत. माळेगावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोलणी करताना आणि पाच वर्षे चेअरमनपदाची ऑफर देताना त्यांना वय दिसलं नाही. आता मात्र ते व्यक्तिगत स्वार्थामुळे अण्णांच्या वयावर बोलू लागले असून त्यांना अण्णांच्या वयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघात सहकार बचाव शेतकरी पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे यांनी केला.
शिरवली येथे सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीने आयोजित घोंगडी बैठकीत बोलताना रंजनकुमार तावरे यांनी अजित पवार यांच्या स्वार्थी राजकारणावर कडाडून टीका केली. राज्याचा व्याप वाढल्यामुळे जिल्हा बँकेत वेळ देता येत नाही असं सांगत नेत्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी माळेगावच्या रणजीत तावरेंना संधी दिली. आता मात्र ते माळेगावच्या चेअरमनपदासाठी नटून बसले आहेत अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवला.
३५ गावातील लोकांच्या प्रपंचाचा भार माळेगाव कारखान्यावर आहे. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊन चालणार नाही. आताच्या संचालक मंडळाने ३८०० रुपये दर असताना ३४०० रुपयांनी साखर विकली.
साखर निर्यातीचा आदेश निघण्यापूर्वी या संचालक मंडळाने हा उद्योग केला. आम्ही सुचवायला गेलो तर वेगवेगळी कारणं सांगितली. आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला तेव्हा कुठे या संचालक मंडळाला जाग आली. त्यानंतर ३७१५ रुपयांनी साखर विक्री केली, तेव्हा कारखान्याला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा फायदा झाल्याचे रंजनकुमार तावरे यांनी नमूद केले.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारखान्याचे कामकाज चालवले आहे. राज्याचे नेते सांगतात मी माळेगावचा चेअरमन होणार आणि राज्यात सर्वाधिक दर देणार. इतके दिवस जिल्हा बँकेत वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि आता ३५ गावातील लोकांचे प्रपंच अवलंबून असलेल्या माळेगाव कारखान्यावर लक्ष देतात.
तुम्हाला इतकाच पुळका आहे, तर तुमच्या खासगी कारखान्यांनी आजवर दर का दिला नाही असा सवाल तावरे यांनी उपस्थित केला. सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.