शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे” एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिबिर दिमाखात संपन्न

‘एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे बारामतीचा उल्लेख जागतिक पातळीवर होईल

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे “एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे” एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिबिर दिमाखात संपन्न

‘एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे बारामतीचा उल्लेख जागतिक पातळीवर होईल

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे २० जून २०२५ रोजी संस्थेच्या ग. दि. मा. सभागृहात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. आदित्य अभ्यंकर, मायक्रोसॉफ्टच्या उपाध्यक्ष सपना नेरिया, वॉशिंग्टन विद्यापीठाचे डॉ. लव खोत, आर. जी. एस .टी, सचिव डॉ. नरेंद्र शहा, ॲड. ए. व्ही. प्रभुणे, ॲड. नीलिमा गुजर, योगेंद्र पवार, किरण गुजर, मंदार सिकची, विठ्ठल मणियार, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज आणि कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीचे सीईओ निलेश नलावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पवार म्हणाले कि, “एआय सेंटर ऑफ एक्सलन्स हे बारामतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंत मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसारख्या महानगरापुरते मर्यादित होते. आता ते बारामतीतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.”

ए आय तसेच जनरेटिक आय या तंत्रज्ञानाचे बहुआयामी फायदे अधोरेखित करत, अच्युत गोडबोले आणि डॉ. आदित्य अभयंकर यांनी आरोग्य, कृषी, शिक्षण, संगीत, चित्रकला, अर्थव्यवस्था व ऑटोमोबाईल्स यांसारख्या विविध क्षेत्रांतील एआयच्या बदलांचा सखोल आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. एआय’मुळे शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडणार असून, विद्या प्रतिष्ठानमधून तयार होणारी तंत्रज्ञ मंडळी उद्याच्या जागतिक स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करतील, असा विश्वास या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
या वेळी योगेंद्र पवार यांनी सांगितले की, “देशातील पहिले एआय महाविद्यालय बारामतीत सुरू होत असून, हा संपूर्ण प्रकल्प शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाला असे गौरव उद्गार काढले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले, “तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नका, त्यावर प्रभुत्व मिळवा. विद्या प्रतिष्ठानने जागतिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या दारात आणले आहे.

याचा पुरेपूर उपयोग करून आपल्या जीवनात क्रांती घडवून यशस्वी करिअर करा असे बहुमोल विचार व्यक्त केले. या एकदिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन ट्रेंड्सवरील चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.

‘एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे बारामतीचा उल्लेख जागतिक पातळीवर होईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेशाचे नवीन दालन खुले होईल, असा विश्वास सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याप्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष कष्ट घेतले. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यशाळेची सांगता झाली.

Related Articles

Back to top button