शेतकरी हिताच्या चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत नव्हते; पाटलांचा आरोप.

शेतकरी हिताच्या चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत नव्हते; पाटलांचा आरोप.
केंद्रातील मोदी सरकारनं केलेल्या कृषीविषयक कायद्याचे जोरदार समर्थन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
कोल्हापूर: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा असताना ‘जाणता राजा’ म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाहीत, शिवसेना लोकसभेत पाठिंबा देते आणि राज्यसभेत त्याला विरोध करते. हा सगळा सावळा गोंधळ आहे, यांना स्वार्थ महत्त्वाचा वाटतो, शेतकऱ्यांचे हित नाही,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला.
कृषी विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून आल्याने आणि त्यांना शेतकर्यांच्या समस्या माहीत असल्याने ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. तरीही केवळ राजकीय विरोध म्हणून या नव्या विधेयकाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला हेच कळले नाही. अकाली दलाची पंजाबमध्ये बहुसंख्य बाजार समितीवर सत्ता आहे, ती सत्ता जाईल या भीतीपोटी हा पक्ष या कायद्याला विरोध करत आहे. काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात हा विषय मांडला होता. मग आता त्याला विरोध कशासाठी असा सवाल त्यांनी केला.