राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान केल्याच्या विरोधात सकल धनगर समाज आक्रमक
भाजप नेते सिंधिया यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान केल्याच्या विरोधात सकल धनगर समाज आक्रमक
भाजप नेते सिंधिया यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
मध्यप्रदेशातील गुना या ठिकाणी नगरपालिकेने एका चौकाला असणारे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदलून सागरसिंह सिसोदिया असे केले आहे.त्यामुळे सकल धनगर समाज आक्रमक झाला असून सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत आज (दि.१०) रोजी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
भारत वर्षातील पहिली महिला राज्यकर्ती, कर्तव्यकठोर प्रशासक, सामाजिक व धार्मिक कार्यातून देशभर अजरामर झालेल्या लोकमातेचे नाव बदलण्याचा करंटेपणा गुना ( मध्यप्रदेश ) नगरपालिकेने केला आहे. त्यास भाजपचे मध्यप्रदेशातील नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या जातीवादी, मुजोर,उर्मट प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. या सर्व प्रकाराचा सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे तीव्र शब्दात धिक्कार करत आहोत असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून सकल धनगर समाजाची अस्मिता अभिमान असलेल्या लोकमाता अहिल्यादेवींचे नाव पूर्ववत करण्यात यावे. भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोक मातेची व धनगर समाजाची जाहीर माफी मागावी. अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने देशभरामध्ये तीव्र आंदोलन केले जाईल व भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही व राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.असा इशारा देखील सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष किरण गोफणे म्हणाले की, अहिल्यादेवी यांच्या नावाने असणाऱ्या चौकाचे नाव बदलून सध्याच्या मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री सिसोदिया यांच्या आजोबांचे तिथे नाव देण्यात आलं व त्या नामकरण सोहळ्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया त्या ठिकाणी उर्मटपणे म्हणाले की,आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत सरकार ठरवेल कोणाचं नाव द्यायचं कोणाचा नाही.त्यामुळे गोफणे सदरील मंत्र्याबद्दल पुढे बोलताना म्हणाले की, कोणता जरी मंत्री असला किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असूद्या तो कधीही महापुरुषांपेक्षा मोठा नसतो. महापुरुषांचा अवमान करणार्या नेत्यांचा माज आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही.त्या ठिकाणी पुन्हा एकदा अहिल्यादेवींचे नाव घेऊन यथोचित सन्मानाने बोर्ड लावण्यात यावा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने आम्ही करत आहोत असे गोफणे यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी रासपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, रासपचे तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे,प्रकाश पवार,अविनाश मोहिते,तानाजी मारकड, अभिजित भाळे, गणेश घोडक,अक्षय मारकड यांसह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.