जलसंपदाने शेटफळ तलावातून उचल पाणी परवाना निर्णय तात्काळ रद्द करावा – हर्षवर्धन पाटील
- वकीलवस्ती येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन व रस्ता रोको

जलसंपदाने शेटफळ तलावातून उचल पाणी परवाना निर्णय तात्काळ रद्द करावा – हर्षवर्धन पाटील
– वकीलवस्ती येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन व रस्ता रोको
इंदापूर : प्रतिनिधी
जलसंपदा विभागाने शेटफळ तलावातून लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या ६५ शेतकऱ्यांना उचल पाणी परवाने हे बेकायदेशीरपणे दिले आहेत. परिणामी, गेली १२५ वर्षापासून पाणी मिळत असलेली लाभक्षेत्रातील १० गावांमधील शेती उध्वस्त होणार आहे. केवळ राजकीय दबावापोटी जलसंपदा विभागाने उचल पाणी परवाने देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.१७) केली.वकीलवस्ती येथे जलसंपदाच्या कार्यालयासमोर १० गावातील शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह एक दिवसीय धरणे व रास्ता रोको आंदोलन केले. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शेटफळ तलावातून लाभक्षेत्रातील शेटफळ हवेली, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या १० गावांमधील शेतीला पाणी मिळून हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र राज्यकर्त्यांनी नियम धाब्यावर बसवून तलावातून ६५ शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे उचल पाणी परवाना दिला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या लवादाकडे यासंदर्भातील अपील प्रलंबित असताना, सगळे नियम धाब्यावर बसवून राजकीय दबावाने जलसंपदाने तलावाचे भराव फोडून उचल पाणी परवाने देण्याचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे. या निर्णयाविरोधात लाभक्षेत्रातील पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने महादेव घाडगे यांच्या पाणी पुरवठा संस्थेने काल बुधवारी (दि.१६) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
तालुक्यातील काही राज्यकर्ते म्हणतात आम्हाला याबाबत काही माहिती नाही, आमचा यांचेशी संबंध नाही. मात्र हे कोणी केले हे जनतेला माहीत आहे. शेटफळ तलावातील पाण्यावरती लाभक्षेत्रातील १० गावातील शेती, पाणीपुरवठा योजना, दुग्ध व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे जलसंपदाने तात्काळ पाणी परवाने देण्याचा निर्णय रद्द करून, तलावाचे दारे क्र. १ ते २३ वरील नऊ पाणी वापर संस्था कार्यान्वित करून पाणी द्यावे, अन्यथा लढा तीव्र केला जाईल असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
यावेळी बोलताना अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, तलावातून पाणी उपसा परवाने नियमबाह्य दिल्याने लाभक्षेत्रातील शेतीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जलसंपदाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतल्याने शासनास हा चुकीचा निर्णय मागे घेणे शिवाय आता पर्याय राहणार नाही.
यावेळी अजित टिळेकर, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, विजय गायकवाड, अनिल पाटील, विजय घोगरे, प्रतापराव पाटील, धैर्यशील पाटील, शिवाजी हांगे, तुकाराम घोगरे, किरण पाटील,अभिजीत घोगरे, तानाजी नाईक, पवनराजे घोगरे, इन्नूस मुलाणी आदीसह शेतकरी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.