स्थानिक

अजित पवारांवर रंजनकुमार तावरेंचा घणाघात: “अण्णांच्या वयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही!”

तुम्हाला इतकाच पुळका असेल तर तुमच्या खासगी कारखान्यांनी आजवर दर का दिला नाही?"

अजित पवारांवर रंजनकुमार तावरेंचा घणाघात: “अण्णांच्या वयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही!”

तुम्हाला इतकाच पुळका असेल तर तुमच्या खासगी कारखान्यांनी आजवर दर का दिला नाही?”

बारामती वार्तापत्र

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ नेते अण्णांशी सलोखा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता त्यांच्या वयावर बोलू लागले आहेत, अशी सडकून टीका सहकार बचाव शेतकरी पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे यांनी केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवली येथे झालेल्या घोंगडी बैठकीत बोलताना तावरे यांनी अजित पवारांच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र हल्ला चढवला.

“वेळ नाही” म्हणत जिल्हा बँकेचा राजीनामा, आता माळेगावात लक्ष?
रंजनकुमार तावरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, माळेगावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करताना आणि पाच वर्षांसाठी चेअरमनपदाची ऑफर देताना त्यांना अण्णांचे वय दिसले नाही. मात्र, आता वैयक्तिक स्वार्थापोटी ते अण्णांच्या वयावर बोलू लागले आहेत. त्यांना असे बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे तावरे यांनी ठणकावून सांगितले.
अजित पवारांनी राज्याचा व्याप वाढल्याने जिल्हा बँकेत वेळ देता येत नाही, असे कारण देत राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी माळेगावच्या रणजीत तावरे यांना संधी मिळाली. पण आता तेच माळेगावच्या चेअरमनपदासाठी “नटून बसले आहेत,” अशा शब्दांत रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“चुकीच्या लोकांच्या हातात कारभार नको, खासगी कारखान्यांनी दर का दिला नाही?”
माळेगाव कारखाना ३५ गावातील लोकांच्या प्रपंचाचा आधार आहे. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊन चालणार नाही, असे रंजनकुमार तावरे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या संचालक मंडळाने ₹३८०० दर असताना साखर ₹३४०० रुपयांनी विकली, विशेषतः साखर निर्यातीचा आदेश निघण्यापूर्वीच हा व्यवहार केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही सूचना केल्या, तेव्हा वेगवेगळी कारणे सांगितली गेली आणि आंदोलन केल्यानंतरच संचालक मंडळाला जाग आली. त्यानंतर ₹३७१५ रुपयांनी साखर विकण्यात आली, ज्यामुळे कारखान्याला ₹३.७५ कोटींचा फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याचे नेते मी माळेगावचा चेअरमन होणार आणि राज्यात सर्वाधिक दर देणार असे सांगतात, यावर बोलताना तावरे यांनी अजित पवारांना सवाल केला, “इतके दिवस जिल्हा बँकेत वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि आता ३५ गावातील लोकांचे प्रपंच अवलंबून असलेल्या माळेगाव कारखान्यावर लक्ष देता? तुम्हाला इतकाच पुळका असेल तर तुमच्या खासगी कारखान्यांनी आजवर दर का दिला नाही?”
यावेळी रंजनकुमार तावरे यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

Related Articles

Back to top button