गटशिक्षणाधिकारी श्री संपतराव गावडे यांचे गौरवोद्गार !
ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते

गटशिक्षणाधिकारी श्री संपतराव गावडे यांचे गौरवोद्गार !
ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते
सांगवी :–प्रतिनिधी
येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
गत शैक्षणिक वर्षांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, Brain Development scholarship Examination, LFW तर्फे आयोजित Word power Championship, Fun Fair program, पुणे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत अव्वल स्थान मिळवले.
त्यांचा गुणगौरव गटशिक्षणाधिकारी श्री.गावडे साहेब, विस्तार अधिकारी श्री कुचेकर साहेब, शालेय पोषण आहार अधीक्षक श्री.अतुल मोरे साहेब, श्री.संदीप देवकाते साहेब , केंद्रप्रमुख सौ.शोभा सावंत , माळेगाव कारखान्याचे संचालक श्री अनिल तावरे, माजी संचालक श्री विजयराव तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ मनीषा तावरे, उपाध्यक्ष श्री स्वप्निल तावरे,ग्रा.पं.सदस्य श्री.प्रणव तावरे तसेच ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री गावडे साहेब म्हणाले, एका शाळेची इतकी मुले विविध उपक्रमातून गुणवत्तायादीत येत असतील तर भविष्यात निश्चितपणे आपला भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. या शाळेचे शिक्षक खूप तळमळीने काम करत असून आपण काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी आहोत अशी भावना व्यक्त करतानाच येत्या जून पासून बारामती तालुक्यामध्ये एक वेगळी शैक्षणिक चळवळ आपल्याला पाहायला मिळेल असे आश्वासन साहेबांनी या वेळेस दिले.
सांगवी शाळेने विविध स्पर्धा,उपक्रम राबवून त्या माध्यमातून मुलांमध्ये गुणवत्तावाढीची निकोप स्पर्धा निर्माण करण्याचे काम केले आहे. खरोखरच या शाळेची मुलं खूप हुश्शारं आहेत. अशी शाब्बासकीची थापही त्यांनी मुलांच्या पाठीवर टाकली. शाळेसाठी शक्य ती मदत प्रशासनाचे वतीने केली जाईलच परंतु सर्वच मदत शासन देवू शकत नाही त्यासाठी शिक्षक, पालक, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी स्वतः अगर सी एस आर च्या माध्यमातून उर्वरित गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही शाळा आणखी वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. अशी भावना साहेबांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माळेगाव कारखान्याचे संचालक श्री अनिल तावरे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेमध्ये एक रुपयाचीही फी न घेता दर्जेदार शिक्षण घेऊन मुलं विविध स्पर्धेत अव्वल येत आहेत हे या शाळांचं मोठं यश आहे. खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी देऊन सुद्धा अशाप्रकारची गुणवत्ता त्यांच्याकडे मिळत नाही आणि पर्यायाने मध्यमवर्गीय समाजाची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट होत आहे .तरी पालकांनी या गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद शाळेमध्येच आपल्या मुलांना दाखल करायला हवं. गेल्या पाच – दहा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या तीस ते पस्तीस टक्के शाळा बंद झाल्या परंतु सांगवी जिल्हा परिषद शाळेचे काम याच्याविरुद्ध आहे, येथे दरवर्षी पट वाढतच चाललेला आहे.
आज बारामती तालुक्यातील सर्वाधिक पट असलेली प्राथमिक शाळा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एक आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जात आहे. खरोखरच येथील शिक्षकांचे सर्वांनी कौतुक करायला हवं. या ठिकाणी चांगलं काम चालू आहे यामध्ये भविष्यात आणखी वाढ व्हावी.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाचे चांगलं काम सरकारी शाळांमधूनच होऊ शकतं असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना भविष्यात येणाऱ्या नवनवीन बदलांना, तंत्रांना आत्मसात करून मुलांना आणखी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर व अनुकूल राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य युवावर्ग, ग्रामस्थ, पालक, विशेषतः महिला पालक , विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री मारुती जगताप यांनी मानले.