राजकारणात विचार बदलू शकतात, परिस्थितीनुसार काही काही गोष्टी कराव्या लागतात;युगेंद्र पवार स्पष्टच बोलले
पण कुटुंब म्हणून तुम्ही ते तोडू शकत नाही

राजकारणात विचार बदलू शकतात, परिस्थितीनुसार काही काही गोष्टी कराव्या लागतात;युगेंद्र पवार स्पष्टच बोलले
पण कुटुंब म्हणून तुम्ही ते तोडू शकत नाही
बारामती वार्तापत्र
कुटुंब म्हणून पवार एकत्रच आहेत. आम्ही राजकारण आणि कौटुंबिक संबंध नेहमीच वेगळे ठेवले आहेत. राजकारणात एकत्र यायचे की नाही याचा निर्णय खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे.
आम्ही ज्युनिअर आहोत. शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच करावा लागेल, असे युवा नेते युगेंद्र पवार म्हणाले. विद्या प्रतिष्ठानमधील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकारणातील मनोमीलनाबद्दल ते म्हणाले, शरद पवार, अजित पवार यांनी निर्णय घेतल्यास आमची हरकत नाही. सुप्रिया सुळे यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र येणे चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे, त्यावर मी खूप ज्युनिअर आहे. ते ज्या ठरवतील त्याच्याशी आम्ही सहमत असतो, असे युगेंद्र म्हणाले. एकत्र येण्यासंबंधी कुटुंबात चर्चा होत असतात असेही ते म्हणाले.
राजकारणात विचार बदलू शकतात, परिस्थितीनुसार काही काही गोष्टी कराव्या लागतात. पण कुटुंब म्हणून तुम्ही ते तोडू शकत नाही, शेवटी रक्ताचं नाते असते, तुम्ही ठाकरे, मुंडे किंवा कोणतेही राजकीय कुटुंब पहा. कौटुंबिक कार्यक्रमाला सगळेच एकत्र येत असतात. ती आपली परंपरा आहे. आम्हीही ती पुढे नेत आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र आले तर काय होईल हे बघायला आवडेल असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले.
काका,काकी बद्दल आदर कायम
वाढदिवशी खा. सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेत आशीर्वाद घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या माझ्या काकी आहेत. आम्ही ३०-३२ वर्ष एकत्र होतो. मग ते राजकारण म्हणून असो की कुटुंब म्हणून असो. एखादे वर्ष आमचे वेगळे गेले म्हणजे सगळे संपते या विचारांचा मी तरी नाही. काकींबद्दल (खा. सुनेत्रा पवार) माझ्या मनात प्रेम, आदर आहे, तो कमी होण्याचा प्रश्न नाही. काका अजित पवार असतील किंवा काकी नाती कायम आहेत, यापुढेही आदर कायम राहिल असे ही युगेंद्र पवार यांनी सांगितले.