कौतुक सोहळ्याने पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते – अंकिता शहा
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान

कौतुक सोहळ्याने पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते – अंकिता शहा
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोना कालावधीत ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करून माणुसकीचे दर्शन घडवले अशा सर्व कोविड योद्ध्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,अशा कौतुक सोहळ्याने पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते.
लोकशाही उत्सव समिती, इंदापूर, राष्ट्र सेवा दल आणि इंदापूर पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा होत्या. इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा ,राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य साथी सलीम शेख, राष्ट्र सेवा दलाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अरुण होळकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगळे, पत्रकार सुरेश मिसाळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गफूर सय्यद, संदिपान कडवळे, शिवाजी मखरे, रमेश शिंदे, प्रशांत सिताप, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, वृषाली नवगिरे – निंबाळकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, शासकीय निम-शासकीय कर्मचाऱ्यांनी, परिचारिकांनी कोरोना प्रादुर्भावच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवले.परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. त्याबद्दल सर्वांना सन्मानित करण्यात आले.
नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत इंदापूर शहरात विविध सामाजिक संघटनांनी, संस्थांनी आणि इंदापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. गतवर्षी इंदापूर शहराच्या चहू बाजूला चौक्या उभ्या करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात आली. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोना विषाणूमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला अंत्यसंस्कार करण्याचे काम नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. अनेक वेळा माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आज संपन्न झालेला आहे. कौतुकाची थाप पडल्यानंतर आणखी नव्याने काम करण्याची उमेद त्या सार्यांची वाढणार आहे असे नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या.
प्रसंगी बोलताना साथी सलीम शेख म्हणाले की, संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. एक कोणतीही निश्चित उपचार पद्धती नव्हती. मुखपट्टी लावण्याचे बंधन घालण्यात आले काहींनी त्याचे पालन केले तर काहींनी नियमांचे पालन केले नाही. परंतु मृत्यू दर वाढल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या विषाणू पासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे हे अनुभवातून लक्षात आले. या कालावधीत ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काम केले त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.
दरम्यान गफूर सय्यद, संदिपान कडवळे, प्रशांत सिताप आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार महेश स्वामी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे, विजय शिंदे, जितेंद्र जाधव, सिद्धार्थ मखरे, देविदास राखुंडे आदींनी प्रयत्न केले.