बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पूर्ण क्षमतेने सुरू;युगेंद्र पवार!
गरज पडल्यास चारा छावणी सुरू करण्याचे संकेत

बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पूर्ण क्षमतेने सुरू;युगेंद्र पवार!
गरज पडल्यास चारा छावणी सुरू करण्याचे संकेत
बारामती वार्तापत्र
बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या जनाई-शिरसाई उपसा जल सिंचन योजनांद्वारे पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. सुमारे ३० दिवस हे आवर्तन चालणार आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती युवा नेते युगेंद्र पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पवार यांनी जनाई योजनेच्या पंपगृहाला भेट देऊन माहिती घेतली.
तिव्र उन्हाळा जाणवत असल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जनाई-शिरसाई उपसा जल सिंचन योजनांद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या योजनेचे तीन पंप चालू केले असून, शनिवारी (ता.२) पूर्ण क्षमतेने योजनेचे पंप चालू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांच्या समवेत सदाशिव सातव, सतीश खोमणे, राजेंद्र जगताप, पोपटराव पानसरे, संजय पोमण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या उन्हाळ्यामुळे तालुका दौरा चालू आहे.
गरज पडल्यास चारा छावणी सुरू करण्याचे संकेत त्यांनी बोलताना दिले. पवार म्हणाले – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रशासनावर पकड होती. सर्वांच्या मनात आदरयुक्त भिती होती. त्यांच्यानंतर आता पाणी सुटेल का, कोण सोडणार असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वांना पडला होता. परंतू, आम्ही सिंचन भवनला जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याबाबत पाठपुरावा केला.
योजनेच्या लाभधारक गावात सर्वांना पाणी मिळेल असे नियोजन आहे. याशिवाय बंद पाईप-लाईनद्वारे पाणी पुरवठ्याच्या कामास लवकरच सुरूवात होईल असे त्यांनी या वेळी सांगितले. शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो विहिरी, तलाव, ओढा खोलीकरणांची कामे केल्याने त्याचा चांगला फायदा परिसरात झाला. निरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पाचा पाठपुरावा चालू असून, मुख्यमंत्र्यांनी अर्थ संकल्पात निधीची तरतूद केली असून, हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार सुमारे २ लाख, २० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चौकशी झाली पाहिजे. २०२९ च्या निवडणूकीत पवार विरूद्ध पवार असतील का या प्रश्नावर ते म्हणाले – आणखी तीन-साडेतीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे त्यावर आताच बोलणे उचित होणार नाही. परंतू, असे घडू नये असे मला वाटते. पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे नेते निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिली. यावेळी कार्यकर्ते हनुमंत चांदगुडे, समाधान देशमुख, नितीन लडकत, महेश चांदगुडे, अतुल खैरे, महादेव भोंडवे, शुभम भोंडवे, अश्विन कुतवळ, अनिकेत कुतवळ, महेश कुतवळ, किशोर तावरे, स्वप्निल चांदगुडे, शेखर खंडागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.






