राज्यातील 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलली जाणार ?
ठाकरे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलली जाणार ?
ठाकरे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तडीस जात नाही तोवर राज्यात एकही निवडणूक होऊ देणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनीही घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नमती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्याबाबत ठाकरे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यात 5 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूका नको अशी भूमिका घेतली होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे