राजकीय

सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्री होणार? जय पवारांचे सूचक विधान

दादांची ती इच्छा अपूर्ण राहिली

सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्री होणार? जय पवारांचे सूचक विधान

दादांची ती इच्छा अपूर्ण राहिली

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले तरी, आता त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार का?

अशी ही चर्चा आहे. ही चर्चा सुरु होण्यासाठी निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी केलेले एक अत्यंत धाडसी वक्तव्य. या वक्तव्याने 2029 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय म्हणाले जय पवार?

बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी आगामी राजकीय वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले. मात्र, केवळ आमदारकी नाही, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात ही बारामतीकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातून भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही केवळ बारामतीकरांचीच नाही तर राज्यातील राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, नियतीने घात केला आणि दादांची ती इच्छा अपूर्ण राहिली. आता सुनेत्रा वहिनी सध्या खूप कष्ट घेत आहेत, लोकांमध्ये जात आहेत. त्यामुळे 2029 ला त्यांनीच निवडणूक लढवावी आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हाती घ्यावीत, असे जय पवार म्हणाले. या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे.

जय पवार दिल्लीला जाणार?

सुनेत्रा पवार यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा दिल्याने ती जागा रिकामी झाली आहे. या जागेवर जय पवार दिल्लीला जाणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, जय पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चर्चा होत असल्या तरी मी इथेच राहून सर्वांसाठी काम करणार आहे, असे म्हणत त्यांनी आपण खासदारकीच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्रिपदावरून पेच वाढणार?

राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री असून त्यांचीही नजर मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मानलं जातं.अशा परिस्थितीत जय पवार यांनी थेट 2029 च्या मुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव पुढे केल्याने महायुतीत आगामी काळात नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये 2029 चा मुख्यमंत्री कोणाचा असेल, हे पाहणे आता अधिक रंजक ठरणार आहे.

Back to top button