शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या – हर्षवर्धन पाटील
नुकसानग्रस्त फळबागा व पिकांचे पंचनामे करण्याची केली मागणी

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या – हर्षवर्धन पाटील
नुकसानग्रस्त फळबागा व पिकांचे पंचनामे करण्याची केली मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी शासनाने फळबागा व इतर नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी ( दि.४) केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्षे, केळी, डाळिंब आदी फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये हा अवकाळी पाऊस सुमारे ७० ते ८० मी.मी एवढा उच्चांकी झाला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झालेला नाही, त्यामुळे फळबागा व इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, झालेल्या आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अजूनही कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने केळी सह शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळालेला नाही. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भरच पडली आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.