स्थानिक

बारामतीतील गुन्हेगारी कमी होण्यामागे ‘चहा वाला बाबा’ महत्त्वाचा?

किरकोळ वादांना गुन्ह्याचे स्वरूप येण्यापूर्वी समुपदेशन; बारामती शहर पोलिसांच्या भूमिकेची चर्चा

बारामतीतील गुन्हेगारी कमी होण्यामागे ‘चहा वाला बाबा’ महत्त्वाचा?

किरकोळ वादांना गुन्ह्याचे स्वरूप येण्यापूर्वी समुपदेशन; बारामती शहर पोलिसांच्या भूमिकेची चर्चा

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात एखादा वाद किंवा तक्रार घडली की नागरिक थेट पोलिस ठाण्याची वाट धरतात. मात्र प्रत्येक वादाचे स्वरूप आणि तीव्रता सारखी नसते. काही प्रकरणे ही गैरसमज, किरकोळ भांडण किंवा क्षणिक वादातून निर्माण झालेली असतात. अशा प्रकरणांमध्ये परिस्थिती समजून घेऊन योग्य पद्धतीने समुपदेशन करण्याची भूमिका बारामती शहर पोलिसांकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे सध्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडून किरकोळ स्वरूपाच्या वादांमध्ये संबंधित व्यक्तींची बाजू ऐकून घेणे, वादाचे मूळ कारण समजून घेणे आणि कायदेशीर परिणामांची जाणीव करून देत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर संबंधितांना चहा देत शांत वातावरणात संवाद साधण्याच्या या पद्धतीमुळे त्यांना अनौपचारिकपणे ‘चहा वाला बाबा’ असे म्हटले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ‘मन की बात’सोबत बारामतीत **‘चाय की बात’**चीही चर्चा होताना दिसत आहे.

किरकोळ वाद वेळेत मिटल्यास त्याचे पुढे मोठ्या भांडणात किंवा कायदेशीर वादात रूपांतर होण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे पोलिसांचे समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक प्रयत्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

मात्र गंभीर किंवा दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई होणे महत्त्वाचे आहे. समुपदेशनाचा उपयोग केवळ कायदेशीर चौकटीत योग्य ठरणाऱ्या किरकोळ वादांमध्येच होऊ शकतो.

“गुन्हा घडण्यापूर्वी वाद मिटवला, तर पुढचा त्रास टाळता येतो” या दृष्टिकोनातून बारामती शहर पोलिसांची ही भूमिका सध्या चर्चेत आली आहे.

Back to top button