इंदापुरात हिंदू मुस्लिम बांधवांकडून एकोप्याचे दर्शन
इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत
आदित्य बोराटे –
हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
शहरातील दर्गाह मज्जिद चौकात सामाजिक कार्यकर्ते अर्शद सय्यद मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी (दि.10) मार्च रोजी सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते. समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल. अँड.आसिफ बागवान,फिरोज पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले; तर सामाजिक कार्यकर्ते अर्शद सय्यद यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्त्व विशद केले. यावेळी इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा,नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, शकील सय्यद,उमेश मखरे,शुभम पवार,पोपट शिंदे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे, अशोक मखरे सर, शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, प्रशांत उंबरे, अजिंक्य जावीर, सुभाष खरे,रितेश जगताप,गफूर सय्यद,मनोज राजगुरू,गणेश महाजन,प्रवीण हरणावळ,आरिफ पठाण,अब्दुल मुशाईदी मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते.